मुंबईतील अनेक भागांतील मराठी शाळा बंद पडत आहेत. याविरोधात मराठी अभ्यास केंद्राने आता आवाज उठवला आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी १८ डिसेंबर रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाद्वारे शाळांचे पाडकाम थांबवण्याची मागणी केली जाईल. मराठी शाळांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी पालकांनी आग्रह धरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मराठी शाळांचा स्थितीदर्शक अहवाल तयार करण्याचीही मागणी केली आहे

मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना शोधण्यासाठी आणि वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राने आयोजित केलेली ‘ठरवून बंद पाडलेल्या/पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची परिषद’ रविवारी दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात पार पडली. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि पालकांच्या उपस्थितीत मराठी शाळांच्या सद्यस्थितीवर विचारमंथन झाले आणि पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. पवार बोलत होते.
या परिषदेत लोअर परळ येथील राजुजी मानाजी चाळ शाळेबद्दल विजय मोरे, गोवंडीच्या रफीकनगर शाळेबद्दल जालिंदर सरोदे, मानखुर्दच्या चेंबूर माध्यमिक शाळेबद्दल संतोष सुर्वे, शिवडीच्या दोन ऑक्टोबर वसाहत शाळेबद्दल शिवनाथ दराडे, न्यू माहीम आणि मोरी रोड शाळेबद्दल प्रणाली राऊत, विक्रोळीच्या टागोरनगर शाळेबद्दल डॉ. योगेश भालेराव, मानखुर्द गावातील शाळेबद्दल संगीता कांबळे आणि मुंबईतील शाळांबद्दल एफ. एम. इल्यास यांनी मांडणी केली. त्यानंतर माहिती अधिकार तज्ज्ञ सुरेश हेगिष्टे (फोरम फॉर जस्टीस), नाशिकच्या ‘शाळा वाचवा समिती’चे दीपक डोके, तसेच संपर्क संस्थेचे उत्पल व. बा. यांनी विविध मुद्द्यांद्वारे मराठी शाळा वाचवण्यासाठीची मोहीम कशी पुढे नेली जाऊ शकते, याबाबत मार्गदर्शन केले.








