Third Mumbai-Pune Expressway: सध्या मुंबई ते पुणे प्रवासासाठी जुना मुंबई-पुणे महामार्ग (NH 48) आणि यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत या दोन्ही मार्गांवर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई आणि पुणे या महत्त्वाच्या दोन शहरांना जोडणारा तिसरा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

Third Mumbai-Pune ExpressWay: मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा तिसरा द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या द्रुतगती महामार्गामुळे दोन्ही शहरांतील प्रवासाचा कालावधी अवघ्या दीड तासांवर येणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. हा मार्ग विद्यमान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला समांतर असेल. या प्रकल्पामुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि सुविधाजनक प्रवासाचा अनुभव मिळेल, तसेच भविष्यातील वाहनांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरेल.
नव्या महामार्गाची गरज का?
वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तिसऱ्या मुंबईच्या विकासामुळे भविष्यात मुंबई-पुणे मार्गावरील वाहनांची संख्या लक्षणीय वाढणार आहे. यामुळे विद्यमान द्रुतगती महामार्गावरचा ताण कमी करण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा तिसरा महामार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा मार्ग प्रवासाचा वेळ कमी करेल आणि आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना देईल.
कसा असेल हा नवीन महामार्ग?
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पुणे-बंगळूरु द्रुतगती महामार्गाचा विस्तार थेट मुंबईपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा तिसरा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग अटल सेतूपासून सुरू होईल आणि पुणे वर्तुळाकार रस्त्याला (Pune Ring Road) जोडून पुढे पुणे-बंगळूरु महामार्गाला मिळेल. या नवीन मार्गिकेची लांबी सुमारे 130 किलोमीटर असेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महामार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर केवळ दीड तासात पार करता येणार आहे.
‘मिसिंग लिंक’ प्रकल्प लवकरच पूर्ण
तिसऱ्या महामार्गासोबतच, सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पही लवकरच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) अंतर्गत सुरू असलेल्या खोपोली एक्झिट ते कुसगाव या 13.3 किलोमीटरच्या पर्यायी रस्त्याचे 94 टक्के काम पूर्ण झाले असून तो ऑक्टोबर 2025 पर्यंत प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पात डोंगराळ भागात 130 मीटर उंचीचा केबल पूल बांधण्यात आला आहे.








