महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यासह अनेक भागांत काही दिवसांपासून ढगाळ वातावरण राहीलं असून मकर संक्रांतीपूर्वी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यातील अनेक भागांत गारठा कायम राहणार असून येत्या काही दिवसांत कसं असेल हवामान?

मुंबईः जानेवारीत थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून, मकर संक्रांतीच्या सणालाही पावसाची साथ मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार, याबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेला अंदाज जाणून घेऊया.
मुंबईतील हवामान
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. रात्री आणि पहाटे थंडावा जाणवत असला, तरी दुपारच्या सुमारास उकाडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवार, 13 जानेवारी रोजी दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मुंबई शहराचं कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 18 ते 22 अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवामान प्रणालीमुळे काही दिवसांपूर्वी दक्षिण भारतात पावसाला सुरुवात झाली होती. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही जाणवत आहे. सोमवारी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोल्हापूरात काल दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. यासोबतच सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागांतही ढगाळ वातावरण दिसून आलं.
मराठवाड्यात गारठा कायम
पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट काहीशी ओसरली असली, तरी मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर कायम आहे. जालना, बीड, लातूर, परभणीसह अनेक जिल्ह्यांत मंगळवारी सकाळी दाट धुक्याचं चित्र पाहायला मिळालं. किमान तापमानाचा पारा 8 ते 14 अंश सेल्सियसपर्यंत घसरू शकतो, तर कमाल तापमान 27 ते 31 अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, येत्या 16 जानेवारीपर्यंत मुंबई, पालघर, ठाण्यासह पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट परिसरात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा सणआणि महापालिका निवडणुकांच्या काळात मुंबईकरांना पावसाळी वातावरणाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.







